गुणरत्न सदावर्ते यांची आतापर्यंतची भाषणं तपासली पाहिजेत – हसन मुश्रीफ

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

दरम्यान, काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून या प्रकरणावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, पण पवारांच्या घरावर जो काही हल्ला झाला तो दुर्दैवी आहे. या सगळ्या कामगारांना उसकवण्याचं काम ज्यांनी केलं, त्या गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली जावीत अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

राज्यभर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटणार असल्याचं सांगत हसन मुश्रीफ म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांची आतापर्यंतची भाषणं तपासली जावीत. पहिल्यापासून त्यांनी या सगळ्या कामगारांना वेठीस धरलं. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याची खोटी स्वप्न दाखवून त्यांना उकसवण्याचं काम करण्यात आलं. पवारांनी सातत्याने हा प्रश्न मिटावा यासाठी प्रयत्न केले असं सांगत भाजपच्या पाच वर्षांच्या काळात एसटीचे विलिनीकरण का केलं नाही असा सवालही हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे.