‘कोरोना काळात ज्यांनी खाल्ले खोके त्या बोक्यांची कॅगमार्फत चौकशी म्हणजे एकदम ओक्के’

मुंबई – मुंबई महालिकेतील (Mumbai Municipal Corporation) १२ हजार कोटींच्या कंत्राटांची विशेष कॅगमार्फत चौकशी होणार आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. माजले होते बोके, कोरोना काळात खाऊन खोके त्यांची कॅगमार्फत चौकशी म्हणजे एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज येथे दिली.

मुंबई भाजपा कार्यालयात आज आमदार ॲड आशिष शेलार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्याचे जोरदार स्वागत केले.

याबाबत आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेत दुरव्यहार, दुराचार आणि भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही सातत्याने सांगत होतो. या सगळ्याचे पेव माजले असून त्याला थांबवले पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला आश्वासित केले होते की, विशेष लेखा परिक्षण करू. आता मा. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश निर्गमित केल्याची माहिती आहे. २८ नोव्हेंबर २०१९ पासून २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दहा वेगवेगळ्या विभागात जवळजवळ १२ हजार १३ कोटी रुपयांची जी कंत्राटी दिली गेली. त्या संबंधित हा घपला आहे.

करोना काळात सामान्य मुंबईकर जीव कसा वाचेल या भीतीमध्ये असताना त्याच काळात सत्तेत बसलेल्यांना माझा कंत्राटदारांकडून खिसा कसा भरेल याची त्यांना भ्रांत होती. करोना काळात 3 हजार 538 कोटींची खरेदी झाली त्याची चौकशी होणार आहे. जनतेला आवश्यक म्हणून घेतलेला भूखंड त्या अजमेरा कॉन्ट्रॅक्टरला ॲक्वीझिशेनमधे पैसे दिले किती? ३३९ कोटी रुपये पण अजमेरा कॉन्ट्रॅक्टरने तो भूखंड २ ते अडीच कोटी रुपयाला विकत घेतला. एका बाजूला अडीच कोटी रुपयांना भूखंड घ्यायचा तोच भूखंड महानगरपालिकेने ३३९ कोटी रुपयांना विकत घ्यायचा हे भूखंडाचे श्रीखंड खाल्ले गेले त्याची चौकशी होणार आहे.

चार पुलांची बांधकामे याच काळात झाली. पूल चार आणि खर्च १ हजार ४९६ कोटी रुपये. अमर्याद खर्च करण्यात आला. करोना काळात रुग्णालयात आवश्यकता दाखवून खरेदी झाली ती ९०४ कोटीची… या ३५३८ कोटी मध्यवर्ती खरेदी, ९०४ कोटी रुग्णालयातील खरेदी म्हणजे चार साडेचार कोटी रुपयांची खरेदी.. कंत्राटदार कंपन्या बोगस, एकच कंत्राटदार, जवळच्या नातेवाईकांना कंत्राट यातून मलिदा कमवायचा कार्यक्रम चालू होता. पावसाळ्याच्या कालावधीत ५६ रस्त्यांची दुरुस्ती केली आणि त्यावर २२०० कोटी रुपये खर्च केले तरी मुंबईकरांच्या गाड्या खड्ड्यात आहेत. याची चौकशी होणार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरच झाले नाहीत तरी त्यावर १०४९ कोटी खर्च झाले. तीन मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रावर सुरू ११८६ कोटी खर्च झाले. यांनी कचऱ्यात ही खायचे सोडले नाही. घनकचरा व्यवस्थापनात अजून ही देवनार प्रकल्प सुरू झाला नाही तरी १०२४ कोटी खर्च झाले. २८ नोव्हेंबर २०१९ पासून २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत चौकश्या होणार आहेत. “माजले होते ते बोके, करोना काळात खावून खोके, त्या सगळ्यांची संपूर्ण चौकशी एकदम ओक्के” असा टोला आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाची अशी मागणी आहे की, मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सत्य जनतेसमोर आले पाहिजे. ज्या माजलेल्या बोक्यानी कोरोना काळात जे खोके खाल्ले त्याचा चेहरा एका महिन्यात उघडा झाला पाहिजे.

महमंद गजनीचा एजंट तुम्ही बनता आहात का?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मुस्लिम हा छुपा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खेळला जातो आहे. जागर मुंबईचा यातून मुंबईकरांसमोर सत्य घेऊन जाणार आहोत. उद्धवजी यांना मराठी मुस्लिम अजेंडा चालतो पण मराठी जैन, मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि तर मराठी हिंदू हा अजेंडा चालत नाही याचं कारण काय आहे? महाराष्ट्र आणि मराठीवर कब्जा करण्याचे औरंगजेब जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करू पाहतय का? आता ते त्याच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. ते केवळ मतांच्या तुष्टीकरणापुरते थांबलेले नाहीत. मतांसाठी मराठी माणसाला भुलवायच आणि मुस्लिमांना फसवायच असं धर्माचं मतांच राजकारण करण्यापूरते ते थांबलेले नाहीत तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आता पुढे विघटनाकडे चालला आहे. हिंदूमध्ये विघटन कसे होईल यासाठी हळुवार पेरणी केली जात आहे आणि टूलकिटच्या माध्यमातून हिंदू आणि वेगळे नव हिंदू असे दोन गट तयार केले जात आहेत.

हिंदूमध्ये दोन गट मांडण्याचे धाडस ओवेसीनीसुद्धा केले नाही ते धाडस शिवसेना उद्धव ठाकरे गट केले आहे. औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबर तुम्ही आता महमंद गजनीचा एजंट तुम्ही बनाता आहात का ? असा प्रश्न पडतो आहे. जागर मुंबईचा या कार्यक्रमात विकासविरोधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भ्रम पसरविण्याच्या, तुष्टीकरणाबाबत समस्त मुंबईकराना अवगत करणार आहोत. याच्या बैठका,नियोजन सुरू झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, या जागर मुंबईचा या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आमदार अतुल भातकळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात येत असल्याचे ही आमदार ॲड आशिष शेलार यांनी जाहीर केले.