जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा पराभव नक्की करणार आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचे भाकीत

मुंबई  – मराठवाड्यातील विकासासाठी काय व्हिजन आहे हे बोलण्याऐवजी आमचे बंड कसे योग्य होते आणि सत्ताबदलाचे नाटय कसे रंगले हे बोलण्यातच मुख्यमंत्र्यांनी पैठणच्या सभेत वेळ घालवला असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

शिंदे गटाने जे कृत्य केलेय त्याला घटनात्मक मान्यता मिळालेली नाही. घटनात्मक मान्यता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून येत नाही तोपर्यंत शिंदेसरकार असंविधानिकच आहे त्यामुळे विरोधक हे टिका करतच राहणार असेही महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

पैठण येथील सभेत राज्याला काय फायदा होणार किंवा मराठवाड्यातील विकासासाठी काय करणार हे सांगण्याऐवजी शिंदे यांनी अजितदादा पवार, जयंत पाटील आणि सुप्रियाताई सुळे यांच्या टिकेचा धसका घेतल्याचेच स्पष्ट जाणवत होते असेही महेश तपासे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी कशी जमवण्यात आली याचे चित्र ‘लाडू व पेढे तुला’ कार्यक्रमात लुटण्याचा झालेल्या प्रयत्नातून महाराष्ट्रासमोर आल्याचेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान बंडखोरीचे कृत्य कसे योग्य होते आणि वस्तुस्थितीला धरून कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला मात्र जनता दुधखुळी नाही. महाविकास आघाडी फोडण्याचे जे कृत्य केले आहे त्यावरुन जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा पराभव नक्की करणार आहे असा स्पष्ट इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.