मराठी सिनेमा संपवला जातोय; ‘टीडीएम’ला थिएटर मिळेना, दिग्दर्शक भाऊरावांसह कलाकारांना अश्रू अनावर

पिंपरी चिंचवड- दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा टीडीएम (TDM) हा सिनेमा २८ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. नवोदित कलाकार पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने यांच्या सिनेमात मुख्य भूमिका असून सिनेमातील गाणी आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु सिनेमाला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. यादरम्यान टीडीएमचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सिनेमाला थिएटर न मिळण्याबाबत खंत व्यक्त केली, यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. तसेच कलाकार पृथ्वीराज आणि कालिंदी यांनाही रडू कोसळले होते.

१ मे रोजी भाऊराव आणि त्यांच्या टीमने केलेले एक फेसबुक लाइव्ह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड परिसरातील आहे.

फेसबुक लाइव्हवर बोलताना भाऊराव म्हणाले की, ‘हा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी बनवला आहे, तुम्हाला जर आवडला तर लोकांपर्यंत पोहोचवा. माझी खंत एवढीच आहे की, एवढा चांगला सिनेमा झाला आहे आणि जिथे शो लागले आहेत तिने नव्याने शो लावले जातायंत. लोकांनी शोबद्दल विचारल्यास त्यांना सांगितलं जात आहे की आज टीडीएमचा शो नाही. एखादाच शो आहे, असं सांगितलं जात. यावरुन असं वाटतं की कुठेतरी मराठी सिनेमा संपतोय आणि संपवला जातोय.’

भाऊराव यांनी अगदी भावुक होत म्हटले की, ‘यानंतर आता माझी वैयक्तिक इच्छा राहिलेली नाही की सिनेमा करावा. तुम्ही पाठिंबा दिला तर आम्ही आम्हाला कुठेतरी उभं राहता येईल. आम्ही मोठ्या कष्टाने सिनेमा केला आणि तो थिएटरमध्ये येऊ दिला जात नाही. ही गोष्ट खूप गंभीर आहे.’ यावेळी बोलताना भाऊसाहेब भावुक झाले होते.

त्यांनी या फेसबुक लाइव्हमध्ये असेही म्हटले की त्यांचाच सिनेमा २ महिने लावून ठेवावा अशी मागणी नाही, पण जर चालत असेल सिनेमा तर त्याला थिएटर मिळणं आवश्यक आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडचे उदाहरण दिले, ते म्हणाले की चांगला प्रतिसाद असूनही रोज एक-दोन शो लावले जात आहेत. त्यांनी थिएटरमध्ये विचारणा केल्यास असे उत्तर मिळाले की वरुन सांगण्यात आले आहे की या सिनेमाचा एकच शो लावावा. त्यांनी या प्रकाराला गळचेपी म्हटलं असून, असंही म्हटलं की असंच करायचं असेल तर मला सांगावं लोकांनी तू सिनेमा करण्याच्या लायक नाहीस, सिनेमा करणं तू बंद करावं. यावेळी त्यांच्या उपस्थित चाहत्यांनी भाऊरावांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. उपस्थित लोकांचे म्हणणे होते की त्यांना सिनेमा खूप आवडला आहे.

तसेच अभिनेता पृथ्वीराजने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘सिनेमा खूप चांगला झाला असून तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. थिएटरमध्ये जाऊन पाहणाऱ्यांना हा सिनेमा आवडतोय. एकानेही सिनेमा आवडला नाही असे म्हटले नाही. मात्र ज्यांना शो नाही म्हणून सिनेमा पाहता येत नाही त्यांची निराशा होते. शोची मागणी केली जातेय. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि मराठी सिनेमा नक्की पुढे आला पाहिजे.’ यावेळी बोलताना पृथ्वीराजला अश्रू अनावर झाले होते, तो हात जोडून विनंती करत होता. शिवाय यापुढे सिनेमा करावा की नाही असा प्रश्न पडल्याचेही तो म्हणाला. रसिकांनीच या सिनेमाचं काय करावं हे ठरवावं, असं पृथ्वीराज म्हणाला.

सिनेमाची अभिनेत्री कालिंदीही यावेळी हात जोडून उभी होती आणि तिलाही यावेळी रडू कोसळलं. अभिनेत्रीने विनंती केली की सर्वांनी एकदा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि मग ठरवावं की सिनेमा आवडतोय की नाही. तिने खात्री व्यक्त केली की सिनेमा सर्वांना आवडेल.