मुंबईचा महापौर आमचाच होणार; आशिष शेलार यांची गर्जना

मुंबई – आमचं ठरलं, मुंबईकरांना जो बदल अपेक्षित आहे, तो बदल मुंबईत होणार. मुंबईचा महापौर  आमचाच  होणार, असा विश्वास भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी त्‍यांची पुन्‍हा मुंबई अध्‍यक्षपदी नियुक्ती झाल्‍यानंतर व्यक्त केला.

मुंबई महापालिका निवडणुक तोंडावर असताना भाजपाने मुंबई अध्‍यक्षपदात मोठा बदल केला असून यापुर्वी दोन टर्म अध्‍यक्ष असलेल्‍या आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या गळयात अध्‍यक्षपदाची माळ घातली आहे. केंद्रीय भाजपाकंडून ही नियुक्‍ती जाहीर झाल्‍यानंतर आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे आभार मानत याबाबत आपली सविस्‍तर भूमिका मांडली.

सुरूवातीलाच आमदार आशिष शेलार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, केंद्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत पाटील, नवनिर्वाचित प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, मावळते मुंबई अध्‍यक्ष मंगलप्रभात लोढा यां सगळयांचे आभार मानले. पक्षाने माझ्यावर जो विश्‍वास दाखविला त्‍याला तडा जाणार नाही, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी यावेळी दिली.

मुंबईकरांसाठी आम्‍ही गेली दोन दशकभर ज्‍यांच्‍याबारोबर संघर्ष केला, त्‍या भ्रष्‍टाचारी व्‍यवस्‍थेला तडीपार करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करेन. तसेच केंद्रीय भाजपाला मुंबईत जे काम अपेक्षित आहे ते करत यश संपादन करुन देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही करू. त्‍यासाठी मुंबईतील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिका-यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्‍ही आमचाच महापौर महाापालिकेत बसवू असेही आशिष शेलार यांनी जाहीर केले.

मुंबईतील रखडलेला कोस्‍टल रोड, मेट्रोच्‍या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्‍ये भ्रष्‍टाचार, शालेय साहित्‍य देण्यात झालेला विलंब अशी अत्‍यंत भ्रष्‍ट व्‍यवस्‍था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना या पासून सुटका हवी आहे. ज्‍यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पुर्ण होईल, असेही त्यांनी जाहीर केले