राज्य सरकारने अधिवेशनात राज्यपालांना पदमुक्त करावे अशी शिफारस राष्ट्रपती यांना करावी – खरात

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आज पडसाद पाहायला मिळाले. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपावांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

दरम्यान, सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय या महामानवाचा अपमान करणारी वक्तव्य करत आहेत. हा महाराष्ट्र राज्याचा अपमान आहे त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने अधिवेशनात राज्यपालांना पदमुक्त करावे अशी शिफारस राष्ट्रपती महोदय यांना अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)ने केली आहे.