‘बाईपण भारी देवा’नंतर संगीतकार साई-पियुषला संगीतात करायचेत ‘हे’ नवे एक्सपेरिमेंट

बाईपण भारी देवाचे 'भारी' संगीतकार...

सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) चित्रपटाचा डंका जगभर वाजतोय. या चित्रपटातील कथानकानं सगळ्यांना भारावून टाकलंच आहे पण त्यापेक्षा अधिक या चित्रपटाच्या संगीतानं जगातील कानाकोपऱ्यात विसावलेल्या प्रत्येक मराठी माणासाला आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं. ‘बाईपण भारी देवा’ या टायटल सॉंगवर तर रील्सचा नुसता खच पडला. आणि याचं क्रेडिट जातं ते या चित्रपटाचे संगीतकार साई-पियुष यांना. मराठी संगीत विश्वाला साई-पियुषच्या निमित्तानं एक उत्तम संगीतकारांची जोडी मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पहिल्या भेटीतच साई-पियुषनं ठरवली होती आपली म्युझिक जर्नी..

साई आणि पियुष यांनी रितसर संगीताचं शिक्षण घेतलेलं नसलं तरी त्यांना संगीताचं बाळकडू त्यांच्या घरातनं मिळालं होतं. साईच्या घरात त्याचे बाबा कांचन निंबाळकर उत्तम गिटार वाजवतात तर पियुषच्या घरात त्याच्या वडीलांच्या आजीपासून गाण्याचे संस्कार होत आलेले. भजन-किर्तनाच्या सुरावटीत पियुष लहानाचा मोठा झाला. लहानपणापासून दोघांचा वेगवेगळ्या कारणानं संगीताशी संबंध आला अन् पुण्यातील अनेक संगीत क्षेत्राशी संबंधित स्पर्धांमध्ये हे दोघे भाग घेऊ लागले. आणि तिथेच एका स्पर्धेनिमित्तानं साई-पियुषची भेट घडली अन् दोघांनी संगीताप्रती असलेली आपली आवड एकत्रितपणे पुढे घेऊन जायचं ठरवलं. आणि असा सुरु झाला ‘बाईपण भारी देवा’च्या या हरहुन्नरी संगीतकारांचा संगीतक्षेत्राचा प्रवास.

काम बोललं अन् यश मिळालं…

‘बाईपण भारी देवा’च्या सध्या गाजत असलेल्या सगळ्या गाण्यांना साई-पियुषनं आजच्या ट्रेन्डनुसार साज चढवताना कुठेही ट्रेडिशनल सूर हरवू दिलेला नाही हे स्पष्ट जाणवतं. तसं पहायला गेलं तर साई-पियुष ही जोडी मराठी इंडस्ट्रीत २००८ पासून कार्यरत आहे. २०१० पासून त्यांनी व्यावसायिक कामाला सुरुवात केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

‘मिशन पॉसिबल’,’रणभूमी’,’ती अॅन्ड ती’, ‘आरॉन’, ‘अग बाई अरेच्चा २’, ‘ ख्वाडा’, ‘लग्न मुबारक’, ‘बाईपण भारी देवा’ सारख्या चित्रपटांना तर,
‘दामोदर पंत’, ‘गेला उडत’, ‘ढॅण्टॅ ढॅण्ड’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, ‘के दिल अभी भरा नाही’ सारखी प्रसिद्ध नाटकं तर ‘बन मस्का’, ‘लव्ह लग्न लोचा’ सारख्या काही प्रसिद्ध मालिकां सोबत काही हिंदी डेलीसोप अशा कलाकृतींना साई-पियुषनं आतापर्यंत संगीत दिलं आहे.

इतकंच नाही तर मराठीतील पहिली बिग बजेट वेब सीरिज ‘गोंद्या आला रे’ ला संगीत देऊन साई-पियुषने नवं तंज्ञत्रान असलेल्या डिजिटल माध्यमावरही आपली पकड घट्ट रोवली आहे. ‘कोण प्रविण तांबे?’ सारख्या हिंदी सिनेमाला देखील या जोडगोळीनं संगीत दिलं आहे. आपलं काम बोलत राहिलं,आलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि काम येत गेलं..असं साई-पियुषच्या बाबतील घडत गेलं.

मेलडीमध्ये एक्परिमेंट करायला आवडतील पण..

‘बाईपण भारी देवा’च्या संगीताचे लाखो चाहते निर्माण करणाऱ्या साई-पियुष या संगीतकार जोडीला आता मेलडीमध्ये प्रयोग करायचे आहेत. पण असं करताना त्यांना सध्याच्या ट्रेन्डसनुसारही आपल्या संगीतात बदल आणायचे आहेत. संगीत वर्षागणिक बदलतं,त्यात नवनवीन गोष्टी येतात त्यामुळे आम्ही जे गेल्यावर्षी केलं आहे ते या वर्षी लोकांना आवडेलच अशी हमी देता यायची नाही म्हणून सध्याच्या ट्रेन्डची आमच्या संगीतावर छाप दिसेल असं संगीतकार साई-पियुषचं म्हणणं आहे.

कोण आहेत साई-पियुषचे प्रेरणास्थान?

‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर चाहत्यांच्या फेव्हरेट संगीतकारांच्या यादीत सामिल झालेल्या साई-पियुषला मात्र अनेक संगीतकारांचे संगीत प्रेरणा देतं. आरडी बर्मन,लक्ष्मीकांत प्यारेलाल, ए आर रहमान,सलीम सुलेमान,विशाल शेखर,ते अजय अतुल अशा साऱ्या संगीतकारांचे संगीत साई-पियुषसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येकाचं संगीत वेगळं आहे आणि त्या प्रत्येकाकडून काही ना काही घेण्यासारखं आहे अशी साई-पियुषची धारणा आहे. या प्रत्येकाननं जे काम केलंय त्यामुळेच त्यांनी मोठं नाव कमावलंय आणि आपल्यालाही तसं काम करायचं आहे अशी इच्छा साई-पियुषची आहे.

‘या’ गायकांसोबत साई-पियुषला करायचंय काम..

आतापर्यंत आपण अदनान सामी,सलीम मर्चंट,क्लिंटन सेरेजो,लकी अली,महालक्ष्मी अय्यर,अवधूत गुप्ते,अजय गोगावले, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर यांच्यासोबत काम केलं आहे,ज्यानं मोठा अनुभव आपल्याला मिळाला आहे. भविष्यात श्रेया घोषाल,अरजित सिंगसोबत साई-पियुषला काम करायचं आहे. पण असं असलं तरी आपल्याला नवीन गायकांचे आवाज घेऊनही गाण्यात एक्सपरिमेंट करायला आवडतील असं सांगायाला साई-पियुष विसरले नाहीत.

१५-२० मिनिटांत गाण्याची चाल कशी उतरवतात साई-पियुष?

संगीत सोडलं तर कोणत्याच बाबतील आपले सूर जुळत नाहीत असं साई-पियुषचं म्हणणं आहे आणि म्हणूनच कदाचित एखाद्या गाण्याची चाल करताना खूप नव्या आयडिया आमच्या भिन्न विचारसरणीच्या डोक्यातून समोर येतात. दिग्दर्शकाकडून नरेशन घेतो तेव्हा आम्ही आमच्या झोनमध्ये जातो. आम्ही घाई करत नाही. एक दोन दिवस आम्ही विचार करतो. आम्ही सुचलं की फोनवर डिस्कस करतो. आणि मग जेव्हा केव्हा आम्ही ती चाल करायला बसतो तेव्हाखूप कमी वेळा आम्ही तीन- चार चाली करतो. आधी समोरा समोर आम्ही चर्चा करतो. लाइन ठरवल्यानंतर चाल करायला एकत्र बसतो. आम्ही थॉट शेअर करतो. आमचा विचार ठरल्यानंतर ती चाल उतरवायला आम्हाला केवळ १५ ते २०मिनिटं लागतात.

‘बाईपण भारी देवा’चा प्रवास सोपा नव्हता म्हणूनच सुखकर बनला…

‘बाईपण भारी देवा’चं जे श्रवणीय संगीत आपण ऐकतोय त्याच्यामागे मोठे कष्ट आहेत असं साई-पियुष आवर्जुन म्हणाले. परंपरेला तडा न जाऊ देता आजच्या ट्रेन्डनुसार संगीताला सुरात गुंफताना कसरत झाली पण जो रिझल्ट मिळाला त्याची चव शब्दात सांगणं निव्वळ अशक्य. त्यात काम उत्तम झालंय पण प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहाचलाच नाही तर काय…याचा प्रवासही या चित्रपटाच्या निमित्तानं अनुभवलाय त्यानं खरतंर संयम कसा ठेवावा याची चांगली शिकवण मिळाली. ‘बाईपण भारी देवा’ नं टीम वर्कचं उत्तम तंत्र शिकवलं जे भविष्यात आम्हाला खूप उपयोगी पडेल. आमच्या आजवरच्या कारकिर्दीतलं हे मोठं यश मिळालेलं काम,यातूनच प्रेरणा घेऊन मराठी संगीतात असेच वेगवेगळे प्रयोग करायचेत. आमच्या संगीतावर लोकांना ठेका धरायला लावण्याची नवी संधी आम्ही लवकरच घेऊन येऊ यात शंका नाही.