‘पवारसाहेब, तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली’

 Sharad Pawar :  समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक काल रात्री झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर (Prime Minister Narendra Modi on Twitter)  संदेशातून या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी रुग्णांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे.

दरम्यान, या अतिशय वेदनादायी मुद्द्याचे देखील राजकारण विरोधकांनी सुरु केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांचा देखील या दुखद प्रसंगी संयम ढळल्याचे दिसून आले. समृद्धी महामार्गावरील अपघातावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी म्हटलं की, आमच्या गावातील लोक सांगत होते, एखादा दुसऱ्या अपघातात व्यक्ती गेली. तर, लोक म्हणतात या अपघतात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. रस्ता तयार करण्याच्या संबंध काळात निर्णय घेण्यात, नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सामान्य लोक कळत-नकळत दोषी ठरवतात. पण, आज झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दु:खद आहे.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोवारी हत्याकांड, मुंबई दहशतवादी हल्ला, मावळचा गोळीबार या घटनांत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शरदवासी’ म्हणायचं का?, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्रजींनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत. वेळेची बचत होत आहे.देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. असे सगळे सर्वांना माहीत असूनही, मा. देवेंद्रजींचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी आज श्री.शरद पवार यांनी गाठली. समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना कळस गाठला.  आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. पवारसाहेब, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले.

पवार गोवारी विसरले!पवार मावळचा गोळीबार विसरले..!पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले…!हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले. गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार साहेब त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे.मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही.पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच  शरदवासी म्हणायचे का? पवारसाहेब, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले. पवारसाहेब, तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली.अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.