‘पवार साहेबांनी ओबीसी समाजाला न्याय दिला, लहान घटकासोबत देशात फक्त पवार साहेब उभे राहतात’

मुंबई – ओबीसींना खऱ्या अर्थाने न्याय हा शरद पवार (Sharad Pawar) यांनीच दिला. राज्यातल्या प्रत्येक लहान घटकासोबत उभे राहण्याचे काम करणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहे असे ठाम मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचा प्रकार सुरु केले जात आहे. मुख्यमंत्र्याबद्दल कुणी काही बोललं तर चार तासात कारवाई होते. मात्र महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर गलिच्छ शब्दात लिखाण करून त्यांच्यावर गुन्हा नोंद होतो मात्र कुठलीही कारवाई होत नाही ही दुर्दैवी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. शालेय शिक्षणातून धडे वगळले जात आहे. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला केवळ एक पान दिले जाते तर फुले – शाहू – आंबेडकर यांच्या इतिहासाला किती पाने मिळतील असा प्रश्न पडतो असे मत त्यांनी व्यक्त केले

यावेळी बोलताना ते म्हणाले की, वारकऱ्यांना मारहाण केली जात आहे. ३५० वर्ष परंपरा असणाऱ्या वारकऱ्यांना मारहाण केली जाते. आज राज्यात हिंदू – मुस्लिम वाद घडविण्याचे काम सरकारप्रणित संघटनां मार्फत केले जात आहे. औंरगजेबाचे उद्दातिकरन केले जाते मात्र कारवाई होत नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम समाजासह सर्वांना पोटाशी धरले होते त्यामुळे मुस्लिम बांधवांनी औंरंगजेबाचा उदो उदो करू नये असे आवाहन केले

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यत्तेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न हा धर्मसत्ता करत आहे. देशाची संसद ही पुरोगामी असली पाहिजे मात्र "सेंगोल" ची स्थापना करून लोकशाहीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालला पाहिजे असे मत व्यक्त केले.