शिवसेनेत शीतयुद्ध ? वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळल्याने चर्चांना उधाण

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार असून यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे तर त्या निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीत (MVA) अविश्वासाचे वातावरण आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागलं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतील. त्यामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचेही महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, एका बाजूला या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan parishad election) ही शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सीएम उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. काल आमदारांची मतदान ट्रायल झाली. यावेळी नेतृत्व उपस्थित असायला हवे, अशी एकनाथ शिंदे यांची भावना होती. पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली सेना आणि अपक्ष आमदारांची मतदानाची ट्रायल घेण्यात आली होती. त्यावरूनही शिंदे यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

यातच माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, शिंदे यांची नाराजी कायम असल्याचे आज पुन्हा दिसून आले. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भाषण करण्याचा आग्रह सेना नेत्यांनी करूनही ते बोलले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण करण्यास नकार दिल्याने शिवसेनेत अंतर्गत धुसफुस असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वर्धापनदिन कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण करावे, असा आग्रह नेत्यांचा होता. मात्र, शिंदे यांनी भाषण करण्यास नकार दिल्याचे समजते.