‘दिवसा कोणाला स्वप्न बघायची असतील…’, जयंत पाटलांच्या भावी मुख्यमंत्र्याच्या दाव्यावर संतापले नाना पटोले

मुंबई- २०२४ मध्ये महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे, असे विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले असून त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच जयंत पाटील यांच्या दाव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवसा कोणाला स्वप्न बघायची असतील तर त्यांना बघू देत, आम्ही काँग्रेस म्हणून महत्वाच्या मुद्द्यांवर सध्या लक्ष देत आहोत. आता लगेच कुठल्या निवडणुका नाहीत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपच्या विरोधात जो जो आहे तो आमचा मित्र आहे ,म्हणून आम्ही एकजुटीने लढत आहोत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.