‘भारत जोडो यात्रेला मिळणारी प्रसिद्धी आणि जनमाणसांची अलोट गर्दी पाहून विरोधकांमध्ये पोटशूळ उठला आहे’

बुलढाणा : भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचे प्रकार विरोधकांकडून सातत्याने सुरु असल्याने भारत जोडो यात्रेचा अप्रचार करणाऱ्यांच्या विरोधात माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत सूचक ट्विट करून दोषींवर पोलीसांची कारवाई होणार असल्याचे संकेतही ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

द्वेष भावनेच्या विरोधात, प्रेमाचा संदेश आणि एकात्मतेचा संकल्प घेऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यत भारत जोडण्यासाठी निघालेली यात्रा नुकतीच महाराष्ट्र राज्यातून मध्यप्रदेशच्या दिशेने मार्गाक्रमण करीत आहे. यानिमिताने महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद पाहात या यात्रेला विरोधी पक्षांनी विविध प्रकारे विरोध करण्याचा असफल प्रयत्न केला. मात्र खा. राहुलजी गांधी यांची यात्रा अविरत सुरु असलेली पाहून आता यात्रेची बदनामी आणि अप्रचार विरोधकांनी सुरु केला आहे. या विरोधकांकडून होत असलेल्या टिकेचा आपल्या ट्विटमध्ये समाचार घेत माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विरोधकांना अतिशय गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी “जब योद्धा विजय के मार्ग पर चलता है, तब उसे बदनाम किया जाता है..!

भारत जोडो यात्रेला मिळणारी प्रसिद्धी आणि जनमाणसांची अलोट गर्दी पाहून विरोधकांमध्ये पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच भारत जोडो यात्रेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र एक लक्षात असू द्या, असले अनुचित प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीस तक्रार केली आहेच, कारवाई निश्चित होईलच!“ अशा आशयाचे ट्विट करून भारत जोडो यात्रेची बदनामी आणि अप्रचार न थांबवल्यास कारवाई करण्यात येईल आणि असले अनुचित प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड दम माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने रीतसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे.