‘जातीयवादाचं विष पेरणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेची युती योग्य का?’

Mumbai – संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, देशामध्ये प्रादेशिक पक्ष, अस्मिता संपवून टाकण्याचे कारस्थान सुरू आहे. यालाच लोकशाही मानणारे लोक बेताल बोलत आहेत.न्यायालयात होणाऱ्या निर्णयावर केवळ शिवसेनेचेच भविष्य नाही तर देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, हे देखील ठरेल. आपण एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया.

मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. दुहीची बीजे खडकावर जरी फेकली तरी त्याची पाळमुळं खोलवर रुजून तमाम दौलत खाक करून टाकते. आपण या दुहीच्या शापाला गाडून टाकू. ही वैचारिक युती आहे. मतभिन्नता किती आहे यापेक्षा मत ऐक्य किती आहे, यावर काम व्हावयास हवे. सर्वांना मानवेल भावेल अशी भूमिका घ्यायला हवी. त्याकरिता समन्वय समिती देखील नेमण्यात येणार आहे. देशाला मार्गदर्शक ठरेल असा महाराष्ट्र घडवू.असं ते म्हणाले.

दरम्यान, हिंदुत्वविरोधी संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) शिवसेनेनं (Shivsena) युती करणं हे बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) अपेक्षित आहे का, असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय. संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादी कांग्रेसचीच बी टीम आहे. या संघटनेने नेहमीच हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली आहे. मग बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संभाजी ब्रिगेडसोबत कशी जाऊ शकते. शिवसेनेच्या या निर्णयामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, असं वक्तव्य मनसे नेते गजानन काळे यांनी केलंय.

गजानन काळे म्हणाले, ‘ महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरण्यासाठी राष्ट्रवादीची बी टीम म्हणून ज्यांनी काम केलंय, या संभाजी ब्रिगेडशी राष्ट्रवादीची ड टीम म्हणजे उद्धव सेना यांची युती झाल्याचं जाहीर झालं. बाबासाहेब पुरंदरे, गिरीश कुबेरांविरोधी आंदोलनं या संघटनेने केली आहेत… संभाजी ब्रिगेडने नेहमीच जातीयवादी भूमिका घेतली आहे. माझा शिवसेनेला सवाल आहे, आदरणीय बाळासाहेबांना हेच अपेक्षित आहे का… ज्या हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंसोबत जे शिवसैनिक सोबत आहेत. काही आमदार, नगरसेवक निघूनच गेलेत, पण सामान्य शिवसैनिकही अस्वस्थ आहे. असं ते म्हणाले.