गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम नेहरूंनी केलं – मोदी

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून काल भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापश्यात जाहीर सभा घेतली.

या सभेत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रसने गोवामुक्ती संग्राम संपवण्याचं काम केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवा 15 वर्ष कॉंग्रेसमुळे गुलामगिरीत होता. काही तासात जे काम होऊ शकत होते त्या कामासाठी काँग्रेसने 15 वर्षे लावले.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की गोव्याच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी सैन्याला पाठवणार नसल्याचे जाहीर केले होते. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम नेहरूंनी केलं अशी टीका मोदी यांनी केली.

गोव्याची वाटचाल ही गोल्डन गोव्याच्या दिशेने सुरू झाली आहे. काँग्रेसच्या काळात 25 लाख पर्यटक यायचे मात्र आमच्या सरकारच्या काळात ही संख्या 80 लाखांवर गेली आहे. पर्यटन वाढल्याने रोजगार देखील वाढू लागला आहे. गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे, कॉंग्रेस पक्ष गोव्यातील तरूणांची स्वप्न कधीच समजू शकला नाही असं देखील ते म्हणाले.

या सभेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रभारी सी.टी.रवी, खासदार विजय तेंडुलकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह बार्देश मधील सर्व उमेदवारांनी हजेरी लावली.