ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे; मलिकांच्या अटकेनंतर राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दाऊद सोबत मलिक यांचे नाव आलेले असताना शिवसेना चक्क मलिक यांचा बचाव करताना दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून भाजपनेते नितेश राणे शिवसेनेवर शरसंधान केले आहे.

नितेश राणे यांनी  संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले, की जनाब संजय राऊत आमच्या मुंबईवरती झालेल्या 1993 चा भेकड मुंबई ब्लास्टमध्ये २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते. ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. दाऊद इब्राहीम त्यात सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते.

अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे. ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानता. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळे विसरलात अशी टीका राणे यांनी केली आहे.