‘अजित पवारांनी मंत्रिमंडळात राहू नये ही मराठा समाजाची भावना’

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पुण्यात संभाजीराजे यांच्या उपोषणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी ‘आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरून भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. ‘अजित पवार बेजबाबदार पणे विधाने करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्या विधानाचा निषेधच आहे. नैतिकता शिल्लक नसल्याने ते बेजाबदार विधाने करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातच राहू नये, अशी मराठी समाजाची भावना आता आहे’, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.