‘देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे’

सांगली – महात्मा गांधी (mahatma Gandhi), जवाहरलाल नेहरू(Javaharlal Neharu), मौलाना आझाद (Maulana Azad)यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळतंय.त्याचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांनी सांगली – शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात केले. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्य उभे करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले असेही शरद पवार म्हणाले.

आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातंय आणि राज्य वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे. हा शिराळा तालुका आणि या सांगली – सातारा जिल्ह्यामधून कर्तृत्ववान नेतृत्वाची मालिका होऊन गेली. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू व अशी अनेक नावं आहेत. अशी अनेक कर्तृत्ववान माणसे तयार झाली त्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील यादृष्टीने काम केले. या नेत्यांनी विकासाचं व माणसं जोडण्याचं राजकारण केलं. आज मात्र देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.

गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्रासुध्दा गेल्या दोन वर्षांत एका वेगळ्या विचाराचे राज्य आलं. जे पूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. देशाला हेच चित्र दिसलं या सगळ्या कालखंडात सामाजिक ऐक्य या गोष्टी संबंधी वेगळी भूमिका मांडली गेली असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

काल परवा भाजपशासित कर्नाटक(Karnataka) राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनानी काढला. शेवटी व्यवसाय करायचा असेल तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुसंख्याक करु शकतो त्याचा व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल, माल चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे. परंतु हा या जातीचा, हा या धर्माचा म्हणून तिथे मालच घेऊ नका याप्रकारची कटुता निर्माण करायचे काम जर राज्य हातामध्ये असलेले घटक करू लागले, तर देश पुढे कसा जाईल? सामाजिक आणि राजकीय ऐक्य कसं ठेवायचं हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे.आज या धर्मांध वृत्तीच्या विरोधात सुध्दा एकप्रकारची लढाई आपल्याला लढायची आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

जे राजकारण करायचे आहे ते राजकारण समाजाच्या हिताचे विकासाचे, शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटेल, शेती संपन्न कशी होईल, कामगाराला त्याच्या घामाची किंमत कशी मिळेल, समाजातील उपेक्षित वर्ग आहे तो सन्मानाने कसा जगेल यावर आधारीत राजकारणाची आवश्यकता आहे. मला आनंद आहे त्या आधारावर उध्दव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाने महाराष्ट्राचे हे चित्र बदलायचा निर्धार आज आपण केलेला आहे. त्यामध्ये यश तुमच्या पाठिंब्याने मिळेल अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.