‘द केरला स्टोरी’वरून राजकारण तापलं; जितेंद्र आव्हाड म्हणाले, निर्मात्याला सार्वजनिकपणे फाशी द्या!
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटावरून मोठा राजकीय वाद निर्णाण झालेला आहे. काही राजकीय नेत्यांनी या चित्रपटाचे कौतुक करत हा चित्रपट लोकांमध्ये जागरूकता आणेल असे म्हटले आहे. काही राजकीय नेत्यांनी हा सिनेमा फुकटात दाखवण्याचीही भूमिका घेतली आहे. तर काही राज्यात मात्र या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी द केरला स्टोरी चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ती 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे, अशी माहिती सांगत जितेंद्र आव्हाडांनी आपली भूमिका मांडली.
त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत. त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात. या चित्रपटाचा निर्माता कुणीही असो, त्याला सार्वजनिकपणे फाशी दिली गेली पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96… pic.twitter.com/86TZ8nnGK2
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2023