सामाजिक ऐक्यासाठी कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव समजून घेतले पाहिजे – राजे मुधोजी भोसले

पुणे : नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते  ‘१ जानेवारी, १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज पुण्यात नुकतेच पार पडले.  पुस्तिकेचे लेखक ऍडवोकेट रोहन जमादार (माळवदकर) हे कोरेगाव भीमा लढाईतील इंग्रजांकडील सैनिक व जयस्तंभाचे ‘इन्चार्ज’ जमादार खंडोजी माळवदकर यांचे सातवे वंशज आहेत.

राजे मुधोजी भोसले म्हणाले, “इतिहासाचा सखोल अभ्यास करून सत्य समोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण मूळ संदर्भांचे वाचन केले पाहिजे. युट्यूब आणि सोशल मीडियावरून उपल्बध होणारी माहिती परिपूर्ण नसते. लेखकाने पुराव्यानिशी कोरेगाव भीमा लढाईची माहिती पुस्तिकेत दिलेली आहे. म्हणूनच मी त्याचे प्रकाशन करण्यास होकार दिला. सामाजिक ऐक्यासाठी या लढाईचे वास्तव आपण समजून घेणे गरजेचे आहे.”

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना समान मानून, सोबत घेऊन मोठे कार्य केले. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जगले पाहिजे. इंग्रजांनी ‘डीव्हाईड अँड रूल’ तत्वाचा अवलंब केला. आपण समाजात फूट पडू द्यायची नाही. त्यासाठी आपल्या संविधानातील तत्वांचा अभ्यास, प्रचार केला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.

“समकालीन संदर्भ पुराव्यांसह कोरगाव भीमा लढाईचा सत्य इतिहास पुस्तिकेत दिलेला आहे. इंग्रज मराठा तिसऱ्या युदधातील एक अनिर्णायक लढाई कोरेगाव भीमा येथे झाली. या लढाईत दोन्ही सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते. खुद्द छत्रपती प्रतापसिंह महाराज हे लढाईच्या वेळी दुसरे  बाजीराव पेशवेंसह फौजेसोबत होते. या लढाईच्या इतिहासाला धरून काही लोक सोयीस्कर आणि संदर्भहीन मांडणी करतात. मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केल्यास ही काही जाती अंताची लढाई नव्हते हे समजते,” असे लेखक रोहन जमादार यांनी सांगितले.

“या लढाईच्या स्मरणार्थ इंग्रजांनी जयस्तंभ उभा केला. माझे पूर्वज खंडोजी जमादार यांना इंग्रजांनी जयस्तंभाचे इन्चार्ज नेमले. जयस्तंभावर इंग्रजांनी कोरलेली माहिती वाचली तरी कोरेगाव भीमाची लढाई कोणत्याही विशिष्ट जातीशी जोडता येत नाही हे लक्षात येते. इंग्रजांनी तत्कालीन अस्पृश्य बांधवाना आपल्या सैन्यात प्रवेश बंदी केली. इंग्रजांच्या या जातीवादी धोरणाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी जयस्तंभाला भेट दिली होती,” असेही जमादार म्हणाले.

यावेळी सेवानिवृत्त भारतीय लष्करी अधिकारी कॅप्टन बाळासाहेब जमादार माळवदकर उपस्थित होते. ऍडवोकेट शिवाजीराव कोकणे, मोडी कागदपत्र  अभ्यासक संदीप शिवले यांचा सत्कार करण्यात आला. सौरभ वीरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.