भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

मुंबई – मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून मुंबईत सुरू झालेल्या ड्रग्ज रॅकेटचं प्रकरण अद्याप संपलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात सातत्याने पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आणि एनसीबीच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे.

एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे असा गौप्यस्फोट करतानाच समीर वानखेडे याला मुदतवाढ द्या त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल असे मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मँडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर  जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडुन कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी जाहीर करुन एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान एनसीबीचे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे त्या साक्षीदाराला स्वाक्षरी करण्याची सूचना देत असल्याचेही संभाषण या ऑडिओ क्लीपमध्ये असल्याने एनसीबी कशापद्धतीने फर्जीवाडा करत आहे हे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्य आरोपी करन सजलानी आहे. याशिवाय सहा आरोपी या प्रकरणात आहेत. करन सजलानी याच्या ताब्यातून माल एनसीबीने ताब्यात घेतला. त्याविरोधात अपील नाही. फर्नीचरवालाच्या विरोधात अपील नाही. मात्र समीर खानच्या विरोधात अपील दाखल करुन प्रसिद्धीचा खेळ सुरु आहे. आम्ही न्यायालयीन लढाई न्यायालयात लढू. आम्ही हे प्रकरण क्वॅश करण्यासाठी हायकोर्टात दाखल केले आहे. हायकोर्टात कागदपत्रात असल्याचे सांगितले जात आहे की, ८४ किलोग्रॅम सोकॉल्ड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये आले आहे. याच एजन्सीने लोअर कोर्टात एक किलो १०१ ग्रॅम असल्याचे लिहून दिले आहे. परंतु न्यायाधीशांनी मानले नाही फक्त ६० ग्रॅम प्रकरण होते. फर्जीवाडयाची मर्यादा एनसीबीने पार केली आहे. जर एनसीबी प्रोफेशनल एजन्सी आहे तर एकट्या समीर खानच्यावरोधातच का हे त्यांना सांगावे लागेल असेही नवाब मलिक म्हणाले.

मला घाबरवण्यासाठीच असा प्रकार एनसीबी करत असेल तर मी घाबरणार नाही. जे नियम तोडून काम करत आहेत त्यांच्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले. एनसीबी  अधिकाऱ्याच्या घरातील लोक कोर्टात गेले. माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मला कोर्टाने बोलण्यापासून रोखले. कोर्टाचा आदर करत त्याच ऑर्डरमध्ये कोर्टाला आमच्याकडून स्पष्टपणे विचारण्यात आले एनसीबी किंवा केंद्रीय एजन्सी काही चुकीचं करत असेल तर मला बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे नवीन फर्जीवाडा उघड करायला बंदी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता हे प्रकरण पंचनामा बदलण्याचे आहे. याप्रकरणात एनसीबीचे डीजी किरणबाबू व समीर वानखेडे यांच्यावर काय कारवाई करणार आहे असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

स्मगलरच्यावतीने पीआर एजन्सीचा वापर केला जात आहे. ड्रग्ज पेडलर लाखो रुपये पीआर एजन्सीवर खर्च करून बातम्या पेरण्याचे काम करत आहेत असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला. न्यायाधीश जोगळे यांनी समीर खानला जामीन देताना आपल्या ऑर्डरमध्ये फर्जीवाडा करुन लोकांना फसवण्यात आले आहे असे म्हटले आहे असे असताना समीर वानखेडेकडून पूर्वीचा पंचनामा बदलण्याचा प्रकार होत आहे. एनसीबीचाच अधिकारी आता अडचणीत येत असल्याचे समोर येताच पंचनामा बदलला जात आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.