उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे; नारायण राणे बरसले

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावर मुंबईतील गटप्रमुखांना संबोधित केलं. विराट मेळाव्यात त्यांनी भाजप, राज ठाकरे आणि शिंदे गटावर (BJP, Raj Thackeray and Shinde group) कडाडून हल्ला चढवला. गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा ‘ट्रेलर’ दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाचा पंचनामा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)  यांनी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे चांगलेच आक्रमक झाले होते.

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना ६२ वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत, अशीही टीका राणेंनी केली. उद्धव ठाकरे कधीच खरं बोलत नाहीत, उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा अशीही टीका राणेंनी केलीय. आपल्याला मंत्रीपद मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना (Amit Shah) 10 वेळा फोन केला असंही टीकास्त्र राणेंनी सोडलंय.

गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं असे उद्धव म्हणतात, मग सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप कोणी खाल्ल, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंची औकात आहे का ? हिंदुत्वासाठी कोणतं काम केलं…? अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. मुंबईवर गिधाडे फिरत असल्याची उपमा उद्धव ठाकरे यांनी दिली. पण तो लबाड लांडगा आहे. किती खोटं बोलतो. खरं कधी बोलत नाही. काल परवा पर्यंत अमित शाहांना फोन करून मला भाजपमध्ये घेऊ नये यासाठी प्रयत्न करत होता असा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी गंभीर आरोप केला.