प्लेऑफमधून बाहेर झाल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंना अश्रू अनावर, विराटने कॅपखाली लपवलं तोंड

बेंगलोर-  रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) स्वप्नाचा पुन्हा एकदा चक्काचूर झाला. गेल्या १५ हंगामांपासून आयपीएल ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या आरसीबी संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध (RCB vs GT) झालेल्या शेवटच्या साखळी फेरी सामन्यात आरसीबीला ६ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांच्या प्लेऑफमधून पत्ता कटला.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकी खेळीच्या जोरावर गुजरातला १९८ धावाचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातकडून शुबमन गिलनेही शतक झळकावत संघाला १९.१ षटकातच विजय मिळवून दिला. गिलचे (Shubman Gill) शतक बनताना पाहून आरसीबीचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराज याचा चेहरा उतरला होता. पराभवानंतर बराच वेळ तो निराश चेहरा घेऊन मैदानावर पडून राहिला. तर विराट कोहलीने टोपी घालत आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवले.

असे असले तरीही पराभवानंतर आरसीबी संघ आपल्या चाहत्यांचे आभार मानायला विसरला नाही. शोकाकुल झालेल्या खेळाडूंनी स्टेडियममध्ये आलेल्या त्यांच्या हजारो चाहत्यांचे आभार मानले.