आरसीबी प्लेऑफमधून आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने साजरा केला जल्लोष, व्हिडिओ व्हायरल

बेंगलोर-  रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) स्वप्नाचा पुन्हा एकदा चक्काचूर झाला. गेल्या १५ हंगामांपासून आयपीएल ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या आरसीबी संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध (RCB vs GT) झालेल्या शेवटच्या साखळी फेरी सामन्यात आरसीबीला ६ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्यांच्या प्लेऑफमधून पत्ता कटला.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकी खेळीच्या जोरावर गुजरातला १९८ धावाचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातकडून शुबमन गिलनेही शतक झळकावत संघाला १९.१ षटकातच विजय मिळवून दिला. आरसीबीच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण आरसीबीच्या पराभवावर मुंबईचे प्लेऑफचे तिकीट अवलंबून होते.

आरसीबीच्या पराभवानंतर मुंबईच्या खेळाडूंनी खूप जल्लोष साजरा (Mumbai Indians Celebration) केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुंबईचे खेळाडू गुजरातच्या विजयानंतर आपला संघ जिंकल्यासारखा आनंद साजरा करत होते.

दरम्यान आता चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळणार आहेत.