कपटी शत्रू विरोधात गांधीजींच्या मार्गासोबतच भगतसिंगांच्या मार्गानेही लढावं लागेल – रोहित पवार  

मुंबई –  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. टेरर फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते  हे या अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडींवर भाष्य केले आहे. ते म्हणाले,बिहार निवडणूक प्रभावित करण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत परत उकरुन काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही.

UP निवडणुकीत ध्रुवीकरणाचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसल्याने होणारी पिछेहाट स्पष्ट दिसतेय. परिणामी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचं राजकारण करुन UP तील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा.

आरोप करून रान उठवायचं, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचं, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावं लागेल असं पवार यांनी म्हटलं आहे.