पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘वसंत’ पुन्हा बहरणार

यवतमाळ : उमरखेड, महागाव, पुसद, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘वसंत सहकारी साखर कारखाना’ अतिशय महत्वाचा असून येथील 15 ते 20 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या साखर कारखान्यामुळे सुगीचे दिवस यावे, यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पुढाकारातून वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. कारखाना सुरू करणे व अवसायनाची प्रक्रीया मागे घेणे या विषयावर निमंत्रक वसंत साखर कारखाना बचाव संघर्ष समिती उमरखेड यांनी पालकमंत्री यांना विनंती केली असता पालकमंत्री भुमरे यांचे निवेदनावर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात सभा बोलावली होती.

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देणेसंबंधाने बँकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळणेकरीता बँकेने संचालक मंळडाची तात्काळ सभा आयोजीत करावी व कारखान्यास ना-हरकत देणेसंबधाने तसा निर्णय घ्यावा, जेणेकरून कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, अशा सुचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभेत दिल्या.

सहकार मंत्री यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या सभेला पालकमंत्री संदीपान भुमरे, साखर आयुक्त पुणे, निमंत्रक वसंत साखर कारखाना बचाव संघर्ष समिती उमरखेड, अवसायक वसंत कारखाना तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर आदि मान्यवर प्रत्यक्ष व व्हिडीओ कॉन्सफरन्सींग द्वारे सभेला उपस्थित होते.