आपली लढाई आता सुरु झाली आहे; प्रियांका गांधी यांचा कार्यकर्त्यांना संदेश 

लखनौ : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तराखंड आणि गोव्यात काट्याची टक्कर आहे आणि तिथं त्रिशंकू स्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान,   उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 200 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 80 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपनं चांगलीच मुसंडी मारल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय. आप 45 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 17 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय.

दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे. नव्या ऊर्जने आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी हा संदेश दिला.