‘आमदार दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते, मात्र ते देखील शिंदे गटात सामिल झाले’

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत  आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. सर्व काही देऊन देखील शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. परंतु, या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय.  बंडखोरी केलेले  15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. परंतु,    गद्दारांना क्षमा नाही. अडीच वर्षे तुमचे हिंदुत्व कुठे होते? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

आमदार दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते. गाडीजवळ येऊन शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे, असे सांगितले. परंतु, ते देखील शिंदे गटात सामिल झाले. माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की दिलीप लांडे असा निर्णय कसा घेऊ शकतात.असा देखील सवाल त्यांनी केला आहे.