शिवसेना आपापसातल्या द्वंद्वामुळे फुटली; आशिष शेलार यांची टीका 

Mumbai – स्वत:च्या पक्षातील लोकं जेलमध्ये आहेत आणि आमच्या युतीच्या पक्षावर हे लोकं टीका करतायत. त्यामुळे यांना नैतिक अधिकार नाही. सुशील मोदींनी शिवसेनेचा उल्लेख  केला असेल तर त्यात चूक काय आहे. शिवसेना आपापसातल्या द्वंद्वामुळे फुटली. आमच्यासोबत जर त्यावेळची  उद्धव ठाकरेंची शिवसेना असती तर अशाप्रकारचं द्वंद्व पाहायला मिळालं नसतं. ती राहिली असती, तर आपापसात द्वंद्व झालं नसतं. आमदार देखील फुटले नसते, अशी टीका भाजप नेते आमदार  अँड आशिष शेलार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

 ही वैचारीक लढाई

प्रदेश कार्यालयात कार्यक्रमा नंतर पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,ही वैचारीक लढाई आहे. मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार वाढला पाहीजे, यासाठी त्यांना ही भूमिका का घ्यावी लागली. याबाबत त्यांना आत्मचिंतन केलं पाहीजे. आमच्या सोबत जेव्हा मा. उद्धव ठाकरे होते. त्यावेळी ते एका विचारधारेबरोबर, हिंदुत्वाबरोबर आणि राष्ट्रहिताबरोबर होते. द्वंद्व येण्याची स्थिती उद्धव ठाकरेंनी आणली आहे. मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला सांभाळणं आणि वाढवणं तसेच त्याला सन्मान देणं ही भूमिका भाजपाने दिली आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

मित्रपक्षाला संपवायचं ही भाजपची रणनिती?

मा.शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांना फार मोठ्या जुन्या गोष्टीची आठवण करून देणं याची आवश्यकता नाही. ज्यांचा जन्म दुसरा पक्ष किंवा त्यावेळचा स्वपक्ष फोडून केला त्यांनी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही. ज्या पक्षातील होते. त्यावेळी त्यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वावर टीका करून संपवण्याचं काम कोणी केलं?, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कसं वागलं पाहीजे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे का?, हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारला पाहीजे. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कुणाला मिळावा याबाबत मत मांडण्याचा संपूर्ण अधिकार मा. शरद पवार साहेबांना आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस इलेक्शन कमिशन नाहीये. त्यांनी त्यांचं मत जरूर मांडावं, पण कायदा कायद्याचं काम ठरवील. महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदेंनी मांडली आहे, असं शेलार म्हणाले.

उखाड दिया म्हणणारे जेलमध्ये

ज्यावेळी एखादा पक्ष बलवान होत जातो. त्यावेळी इतर पक्षांची जागी कमी होत जाते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भारतीय जनता पक्षाने कोणताही पक्ष फोडणे किंवा संपवणे, असं धंदे केलेले नाहीयेत. उखाड दिया म्हणणारे जेलमध्ये गेले आहेत. संपवण्याची भूमिका कोणी घेतली?, त्यांची वाताहात झाली आहे. मोदींच्या विरोधात बोलणारे ईडी आणि कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. भारतीय जनता पक्षाने हे सर्व आरोप सहन केले आहेत. पण कधीच अशा पद्धतीची भूमिका कधीही मांडली नाही. असा विचारच आम्ही कधी केला नाही. इंडिया म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे इंडिया, असं बोलणाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं शेलार म्हणाले.