‘नीच वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मातीची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी’

अकोला : भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले. पुणे भाजपाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात ते बोलत होते. या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातली निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं. “हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी मोदींना शिव्या द्यायचे. माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं.

ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

आमदार अमोल मिटकरी यांची टीका
“आई वरून शिव्या देणे ही आमच्या कोल्हापुरची पद्धत आहे” असे नीच वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मातीची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरकरांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.