परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एस.टी कर्मचाऱ्यांकडे पहात आहोत – उद्धव ठाकरे

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळा  आणि विद्युत प्रणालीवर आधारित बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास परिवहन मंत्री अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, महामंडळाचे आयुक्त शेखर चन्ने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, एखादी सेवा जी आपण रोज बघतो, तिचा वापर करतो तेंव्हा ती किती वर्षाची झाली याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आपल्या एस.टीची ७५ वर्षे अशीच आहेत.देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत.  आपल्या एस.टी ची सुरुवात ही १९४८ साली झाली. पहिली एस.टी कशी होती, तिचं रंगरूप आकार कसं होतं हे आज आपण चित्रफितीच्या माध्यमातून  पाहिलं. आपली एस.टी काळानुरुप किती बदलली हे यातून दिसलं.

एस.टीची ही वाटचाल पुण्यात सुरु झाली  आणि  एस.टीचा आजचा अमृतमहोत्सवी कार्यक्रमही पूण्यात होत आहे हा एक योगायोग आहे.एस.टीची ही अमृतमहोत्सवी वाटचाल सर्व माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी, आजची चित्रफित सर्व वाहिन्यांवरून दाखवण्यात यावी. म्हणजे काळाप्रमाणे एस.टी कशी बदलली हे यातून दिसेल. प्रवासी वाहतूक सेवा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी हवी. एस.टीने हे काम गेली ७५ वर्षे केले.

एस.टीला शुभेच्छा आहेतच. माझ्या शुभेच्छांबरोबरच एस.टीला आज लहान मुलींनीही शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या. म्हणजेच एस.टीचं जे भविष्य आहे तेही त्यांच्या लाडक्या एस.टीला शुभेच्छा देतांना दिसत आहे. संस्कृती जपतांना राज्य आणि देशाचे भवितव्य तुम्ही जपत आहात.कोरोना काळात एस.टीच्या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी पराक्रम केला. त्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही.

गाव तिथे एस.टी असं ब्रीद असतांना कोरोना काळात एस.टीने शहरातही सेवा दिली.  महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणात, गावात एस.टीचे योगदान आहे. एस.टीमुळे माझ्या आयुष्यात किती लाभ झाला असं सांगणारी कितीतरी दिग्गज मंडळी आपल्याकडे आहेत. परिवारातील सदस्य म्हणून आम्ही एस.टी कर्मचाऱ्यांकडे पहात आहोत. म्हणूनच एस.टी अडचणीत असतांना शासनाने मदत केली. सर्वसामान्यांना परवडणारी परिवहन सेवा देण्याच काम एस.टी करत असल्याने एस.टीचा तोटा वाढला. मागील काही महिने, एस.टी कर्मचाऱ्यांच वेतन शासनाकडून दिलं आणि पुढच्या काही वर्षाची हमी शासनाने घेतली आहे

सर्व करता येतं पण पैशांचे सोंग आणता येत नाही. एस.टी कर्मचाऱ्यांसाठी जे  जे करणं शक्य आहे ते केलं आणि यापुढेही करणारच.  त्यात कुठेही मागेपुढे पहाणार नाही. राज्यातील रस्ते आता चांगले होत आहेत. पर्यावरणपूरक वाहनं सर्वात जास्त असणारी मुंबई हे पहिलं शहर ठरणार आहे. एस.टीत सुद्धा हा प्रयोग आपण करत आहोत. एस.टी सेवा प्रदुषणविरहित कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसा आपला प्रयत्न असणार आहे.

एस.टी सुधारणांसाठी नवीन संकल्पना आणतो आहोत.काळ बदलतो तसं तंत्रज्ञान बदलतं, गरजा बदलत आहेत. या बदलाप्रमाणे प्रगती करणं आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे. एस.टी कर्मचारी- तुम्ही -आम्ही, राज्यातील जनता सर्व एका कुटुंबातील सदस्य आहोत. कुटुंबातील सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपण एक आहोत, आपण एकजुटीने जनसेवेचा वसा पुढे चालू ठेऊ या. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीतील तुम्ही एक अविभाज्य घटक आहात, तुम्ही राज्याचं वैभव आहात ते जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.