‘शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नसून हिरवी सेना झाली आहे’

मुंबई  –  राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

या सर्व घडामोडींमुळे भाजपला शिवसेनेला खिंडीत गाठण्याची संधी मिळाली असून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सेनेवर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, एमआयएम शिवसेनेसोबत आघाडीचा प्रस्ताव देते यातच शिवसेनेचं खरं स्वरुप उघड झालं आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची तथाकथित सेक्युलर नव शिवसेना आहे.

ही शिवसेना राहिली नसून हिरवी सेना झाली आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर मुस्लिम लांगूलचालन करण्यात शिवसेना अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांनी एमआयएमशी आघाडी केली काय आणि नाही केली काय आता एमआयएम आणि शिवसेनेत गुणात्मक दृष्ट्या काही फरक राहिलेला नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

शिवसेनेने गेल्या अडीच वर्षात केवळ मुख्यमंत्रीपदाच्या आणि मुलाला कॅबिनेट मंत्री करण्याच्या मोहापायी हिंदुत्व, मराठीबाणा या सर्वांना तिलांजली दिली. आजही औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. त्या शिवसेनेकडून दुसरी अपेक्षा काय करणार? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.