‘जातीय तेढ निर्माण व्हावी, मतांचं विभाजन व्हावं व सत्ताधारी भाजपाला फायदा व्हावा हाच भिडे यांचा उद्देश’   

Mumbai – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही, अशा गलिच्छ शब्दांमध्ये या नालायक माणसाने वक्तव्य केलं आहे. त्यांचे शब्द ऐकले, तर असेल तिथून त्यांना उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे.या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांचाही अपमान या नालायक माणसानं केला आहे. यावरूनच या माणसाची लायकी दिसते, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

संभाजी कसला हा? टोपणनाव वापरून मराठी मुलांना भुरळ घालण्याचं काम तो करतोय. त्याचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे? तो नेहमीच विष का ओकतोय? जातीय तेढ निर्माण व्हावी, मतांचं विभाजन व्हावं व सत्ताधारी भाजपाला फायदा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. समाजात, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणं, काँग्रेसला डिवचणं, महापुरुष, राष्ट्रपुरुष, महात्म्यांचा अपमान करणं आणि आरएसएसच्या लोकांचं गुणगान करणं हे ते सातत्याने करत आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.