हे माहितीय का? भारतातील ‘या’ शहरात बटाटा-कांद्याच्या भावात विकले जातात काजू

Cashew: काजू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रायफ्रुट्समध्ये (Dry Fruits) काजू हे असे एक ड्रायफ्रूट आहे, जे जवळपास सगळ्यांनाच आवडते. जेव्हा तुम्ही बाजारातून काजू खरेदी करता तेव्हा ते तुम्हाला 800 रुपये किंवा 1000 रुपये प्रति किलो दराने मिळते. यामुळेच अनेक आर्थिक दुर्बल लोक काजू खाण्यापासून वंचित राहतात. तुम्हाला कदाचित माहित नसेल की बहुतेक ठिकाणी चढ्या किमतीत उपलब्ध असलेले काजू भारतातीलच एका शहरात फार कमी किमतीत विकले जातात. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु भारतीय बाजारपेठेत 800 ते 1000 रुपये किलोने विकले जाणारे काजू या शहरात केवळ 30 ते 50 रुपये किलोने विकले जातात.

यामुळेच काजू स्वस्त मिळतात
झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यात काजू बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांसारख्याच किमतीत मिळतात. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की इथे इतके स्वस्त काजू मिळण्यामागे काय कारण आहे? खरे तर झारखंडमध्ये दरवर्षी हजारो टन काजूचे उत्पादन होते. जामतारा जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर सुमारे 49 एकर विस्तीर्ण शेतजमिनीवर काजूची लागवड केली जाते. येथे सुक्या मेव्याच्या मोठ्या बागा आहेत. येथे काम करणारे लोक हे सुका मेवा अत्यंत स्वस्त दरात विकतात.

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे, असे असतानाही आपल्याला काजू महागड्या दरात मिळतात. काजूच्या चढ्या किमतीमुळे, शेतकरी मुख्यतः देशातील इतर राज्यांमध्ये देखील ड्राय फ्रुट्सची लागवड करू इच्छितात. काजूंच्या वाढत्या किंमती हे यामागचे कारण आहे. मात्र जामतारा येथे बटाटे आणि कांद्याच्या भावात इथे काजू मिळतात हे जेव्हा लोकांना कळलं, तेव्हापासून इथं लोकांची ये-जा सुरू झाली.

काजू शेती कशी सुरू झाली?
काजूच्या शेतीसाठी शेतकर्‍यांकडे फारशा मुलभूत सुविधा नसल्या तरी शेतकरी मात्र त्यात खूश आहेत. जामतारा येथील लोकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जामतारा येथील माजी उपायुक्तांनी ओडिशातील कृषी शास्त्रज्ञांकडून जमिनीची चाचणी घेतल्यानंतर येथे सुकामेव्याची लागवड सुरू केली होती. काही वर्षांतच येथे काजूची चांगली वाढ होऊ लागली, परंतु सुरक्षा आणि देखरेखीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे पीक एकतर चोरीला जाते किंवा मळ्यातील कामगार ते स्वस्त दरात विकू लागतात.