रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’ :- अतुल लोंढे

मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे रावणराज आहे. महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सुट्टीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसला गेले असून दोघांची अवस्था ही बादशाह-ए-बेखबर अशी आहे, असा घणाघाती हल्ला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे, स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत पण त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. सरकार जनतेशी संवाद साधत नसून पोलीसांच्या दंडेलीच्या जोरावर आंदोलकांवर अत्याचार करत आहे. पोलीस महिलांना मारहाण करत आहेत, बदडत आहेत, आंदोलक महिलांचे मोबाईल फोन, सोन्याचे दागिने या पोलिसांनी हिसकावून घेतले व आता त्या वस्तूही परत देत नाहीत, शिंदे फडणवीस सरकारचे हे पोलीस जनतेच्या रक्षणासाठी आहेत का चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी आहेत. या घटनेची चौकशी करून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई झाली पाहिजे.

बारसूची जनता आपली आहे, त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रकल्पच काय, तिथल्या आंब्याचा पत्ताही हलू देणार नाही आणि जोरजबरदस्ती झाली तर काँग्रेस त्याला प्रत्युत्तरही तेवढ्याच जोराने देईल हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा लोंढे यांनी दिला आहे.