‘दाऊदशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी अधिवेशनात आक्रमक होणारच’

मुंबई – राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्यासाठी रणनिती ठरवली आहे. भाजपची बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीस म्हणाले,  दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच.नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे असं म्हणत फडणविसांनी हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले,शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे.अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही असं देखील फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे.लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे.याचा जाब सरकारला विचारू.देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे.त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी…… तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.