ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबतच…; फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले खडेबोल

मुंबई – गेल्या कधी दिवसांपासून राज्याचे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला असून यात भाषेची मर्यादा देखील अनेकदा ओलांडताना नेते मंडळी दिसत आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.

फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप केला. यासोबतच ठाकरेंनी आपल्या भाषणात जहरी टीका भाजपवर केली.

या टीकेला आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी ‘कलंकीचा काविळ’असा उल्लेख केला आहे. सोबतच ठाकरेंवर हल्लाबोल करत अनेक घटनांची उजळणी देखील केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरेंना उत्तर दिलं आहे. स्वत: कलंकित असलो की कलंकित दिसायला लागतात असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. तर तुम्हाला कलंकीचा काविळ झाल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.

फडणवीसांचे ट्वीट

‘कलंकीचा काविळ’ !

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.