ठाणे, नवी मुंबईनंतर आता आणखी एका शहरातील माजी नगरसेवक शिंदे गटाला पाठींबा देणार

मुंबई : शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी (Deputy CM Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. दरम्यान, सत्ता गेल्यानंतर सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रातील त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आणि ४० आमदारांनी बंड केले आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. त्यानंतर आता पक्षालाही धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते. त्याचवेळी नवी मुंबईतील 32 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.

दरम्यान, बंडाच्या भूकंपाचा ठाणे, नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिवसेनेला धक्का बसणार आहे. या महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवकही शिंदे गटात सामील होणार आहेत. काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेट घेतलेल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 40 असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्येही स्थानिक पातळीवर शिवसेनेला खिंडार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाची ताकद वाढत असून शिवसेना (Shiv Sena) पक्षाची वाताहात सुरू आहे. पक्षाची गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. या अगोदर ठाणे आणि नवी मुंबईतही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. दरम्यान, ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी गुरुवारीच शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. यानंतर आता लवकरच अनेक ठिकाणचे नगरसेवक, नेते देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतील, असा शिंदे गटाचा दावा आहे.