चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, राजधर्माचं पालन करा – आमदार ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई – महिला अत्याचाराच्या घटनांवर पक्षीय राजकारण करणाऱ्या स्मृती इराणी यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशी प्रतिक्रीया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर मणिपूरच्या घटनेबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले. मणिपूर वर बोलणं टाळण्यासाठी आता भाजपने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांना मणिपूर साठी जबाबदार धरण्याचा कांगावा सुरू केला आहे. काल महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी एखाद्या टीव्ही डिबेट किंवा पक्षाच्या सभेत असल्या सारख्या बोलल्या. त्यांचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा होता. असेही त्या यावेळी म्हणाल्या.

मणिपूरच्या घटनेवर बोलायची संवेदनशीलता ही या सरकारमध्ये नाही. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार नाही, या विषयावर राजकारण करायचं नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती, ईशान्येकडच्या राज्यांकडे विशेष लक्ष द्या असं राहुल गांधी नी सांगितलं होतं. मात्र सरकार आता राहुल गांधी यांना या बाबत दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतयं. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, आणि आम्ही या वृत्तीचा निषेध करतो. पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळला पाहिजे अशी मागणी त्यांनी माध्यमांसमोर केली.

तसेच संघ परिवाराशी संबंधित इंडिक टेल ही प्रपोगंडा साइट आहे. या साइटची मालकी सरयू या एनजीओ कडे आहे. ही एनजीओ ही समाजात विष कालवणारा मोडका इतिहास पसरवत असते.

सावित्रीबाईं वरच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर या वेबसाइट वर माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मात्र हा माफीनामा मान्य नाही. या एनजीओ ला आर्थिक रसद पुरवणारे कोण आहेत त्यांची नावे समोर आली पाहिजेत. खोटा इतिहास पेरणाऱ्या या साईटच्या ब्रेन ला अटक झाली पाहिजे. संघपरिवाराशी संबंधित असल्याने कारवाईचं थातूरमातूर नाटक दाखवण्याचा प्रयत्न करून सभागृहात वेळ मारून नेली जात आहे अशी टिका त्यांनी यावेळी केली.

संघ परिवाराशी संबंधित अनेक संस्था आता सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारं साहित्य पुस्तिका रूपाने काढून व्हायरल करत आहेत. काही सोशल मिडीया हँडल्स त्यांना इंग्रजांचे हस्तक म्हणून प्रचार करत आहेत. फुले दाम्पत्याचं सामाजिक कार्य आभाळाएवढं आहे, त्यांनी वंचित घटक आणि सर्व जाती-धर्मातील महिलांना सन्मान दिला. आज आम्ही केवळ या दाम्पत्यामुळे इथे आहोत. अशावेळी त्यांचे योगदान नाकारणारी जी काही टोळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, त्याचा मुखिया संघपरिवारच कसा हा मोठा प्रश्न आहे.त्यामुळे छोट्या मोठ्या लोकांवर तुम्ही कारवाई कराच, पण यामागचे ब्रेन ही समोर आले पाहिजेत. असेही त्या यावेळी म्हणाल्या.