आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – धनंजय मुंडे

Dhananjay Munde – राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmers Suicide) जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी १०० टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढ्या निधीची तरतूद केली आहे तेवढा सगळा निधी वेळेत खर्च करावा.तसेच केंद्र आणि राज्यसरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्यातून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल असेही धनंजय मुंडे म्हणाले.

सेंद्रिय शेती विषमुक्त शेती यासारख्या योजना प्रभावीपणे राबवा. तृणधान्याला आता मोठी मागणी आहे. यादृष्टीने शेतकऱ्यांनी तृणधान्ये उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.तृणधान्यासाठी कृषीविभागाने स्वतंत्र ॲप विकसित करून डी मार्ट – ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मना थेट शेतकऱ्यांना जोडण्याचे काम करावे अशी सूचनाही धनंजय मुंडे यांनी केली.

शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावी, जागतिक कृषी गणना व शेती विषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पदे कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव तयार करावा,कृषीविभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावी, पिकावरील कीड नियंत्रणासाठी ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पोस्ट खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा असे विविध निर्देशही मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

केंद्रसरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर आणखीन वाढीव निधीची मागणी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करावा.विभागाने आर्थिक वर्षात केलेल्या तरतूदीप्रमाणे खर्च केल्यास नवीन वर्षांत वाढीव निधीची मागणी करता येईल असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत