मुर्दाड व नालायक महावितरणचा निषेध, उर्जामंत्र्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा – स्वाभिमानी 

पंढरपूर – राज्यातील शेतकरी विविध संकटांना तोंड देत सावरण्याचा प्रयत्न करत असताना वीज तोडणी करण्याचा सपाटा सरकारकडून लावण्यात आला आहे. यातच आता सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून पंढरपूर तालुक्यात एकाने आत्महत्या केली आहे.

मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. वीज तोडणी, मोगलाई पद्धतीची जादा वीजबिल आकारणी या सर्वांना कंटाळून तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करतानाचा व्हिडिओ शेअर करून आपलं जीवन संपवलं. राज्यातील सत्ताधारी बसता-उठता शिवाजी महाराजांचे नाव घेतात मात्र सरकारचा एकंदरीत कारभार पाहता राज्यात शिवशाही नव्हे तर मोगलाई सुरु आहे का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, आता  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता  रणजित बागल यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आणि उर्जामंत्री नितीन  राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, पंढरपुर तालुक्यातील मगरवाडी येथिल तरूण शेतकरी सुरज जाधव या शेतकऱ्याने महावितरणच्या विजेच्या लपंडाव व विजपुरवठा बंद करण्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. वीज तोडणीचा बळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून उचलेले हे पाऊल आहे. वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी म्हणुन परत जन्माला येणार नाही हे उद्गार त्याचे होते. ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. मुर्दाड व नालायक महावितरणचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या मृत्यूला उर्जामंत्री व महावितरण जबाबदार असुन उर्जामंत्र्यावर 302 व हत्येचा गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मी मागणी करतो.