‘मासिक पाळीदरम्यान देवळात जायचंय…’ अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टची चर्चा

आजही आपल्याला मासिक पाळीबद्दल बरेचसे गैरसमज पाहायला आणि ऐकायला मिळतात. मासिक पाळी आल्यानंतर स्त्रीला ५-७ दिवस बाहेर ठेवलं जातं. तिला घरातील कोणत्या वस्तूला हात लावू दिला जात नाही. सोशल मीडियावरही विज्ञानाचा खोटा आधार घेत लोक मासिक पाळीबद्दल काहीही सांगत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यावर अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने डोळे उघडणारी प्रतिक्रिया दिली आहे.

हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…

आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला… स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ‘ *वैज्ञानिक कारणं* ‘ सांगणारा… का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! I mean, हद होती है यार!

म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास १ मिलियन लाईक्स! आणखी अलार्मिंग गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर, रिल पाठवणारी सोबत अजून बऱ्याच जणी होत्या, सगळ्या मुलीच! एक आत्ता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक microbiology मधे मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेक च्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सिनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत?

बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नको जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका ना किमान! तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा, मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं validation कशाला हवं? समाजाचं आहे की! ‘याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणी पासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही’ हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही!

कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना human reproduction, menstrual cycle च्या मागचं विज्ञान शिकवता येतंय, किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं… मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो! आता फक्त खिन्न वाटतंय… यातून कुणीच वाचणार नाही… विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे, अगदी शेवटापर्यंत, या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!