किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा; अजित पवार सरकारवर संतापले

मुंबई – विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत याबाबत संताप व्यक्त करत सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केली.

राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सदस्य सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात याविषयी बैठकी घेण्याचे आश्वासन देत असतात. मात्र आश्वासन दिलेल्या अनेक बैठका घेतल्याच जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावर कोणताही मार्ग निघत नाही. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बैठका घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले जावे,‍ किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकींचे आयोजन केले जावे अशी सदस्यांची भावना अजित पवार यांनी सभागृहात व्यक्त केली.