सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास काय करणार ? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…

नाशिक : कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे (Satyajit Tambe ) यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असतांना निवडणुकीतून माघार घेणे, आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे.

यातच आता बाळासाहेब थोरात यांनी भाचा सत्यजित तांबे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मुरड घातल्यानेच  हे महाभारत घडत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान थोरात यांनी आपल्या कन्येला राजकीय वारस म्हणून पुढे आणल्याने सत्यजित अस्वस्थ होते. संधी मिळताच सत्यजित तांबे यांनी थोरात यांना ‘मामा’ बनविले.अशी चर्चा आहे.

दरम्यान,  सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतल्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंजक बनली आहे. तसेच काँग्रेसने एबी फॉर्म देऊनही आणि ते डॉ.सुधीर तांबे वर्तमान आमदार असूनही त्यांनी एबी फॉर्म का भरला नाही? याचे उत्तर तेच देऊ शकतात, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

भाजपातर्फे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचाच विचार आम्ही करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली आणि निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.