‘महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हलवून जागं करण्यासाठी हा परिवार संवाद दौरा आयोजित केलाय’

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम आणि विचारमंथन करण्यासाठी बैठका घ्या… पक्ष वाढविण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करा…गोरगरिबांचे प्रश्न सोडवा…त्यांच्या अडीअडचणीला धावून जा…ते तुम्हालाच तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडतील असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतील आजच्या दुसर्‍या दिवशी सकाळी सोलापूर ग्रामीणच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हलवून जागं करण्यासाठी हा परिवार संवाद दौरा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव, शहर फिरत आहोत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आपला पक्ष सर्व स्तरावरील लोकांचा विचार करत आहे. विद्यार्थी संघटनेला विद्यार्थ्यांचे जाळे निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. हीच संघटना २०२९ ला होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची खरी ताकद असेल असेही जयंत पाटील म्हणाले. आपल्याला २०२४ तर निवडणूक जिंकायचीच आहे मात्र २०२९ च्या निवडणुकीची पक्षाला आतापासून तयारी करावी लागेल. त्यासाठी नवतरुणांचे एक जाळं निर्माण करा असे आदेशही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवायचे असेल तर आपल्याला मिळालेली प्रत्येक सीट निवडून आणायला हवी त्यासाठी बुथ कमिट्यांवर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्याला हे यश मिळेल असेही जयंत पाटील म्हणाले. बीडने जास्त आमदार दिले आहे, नाशिकने जास्त आमदार दिले आहे. त्याचप्रमाणे सोलापूरही सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ शकतो. त्यापद्वतीने पाऊले टाका असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.