‘आंदोलक म्हणजे आतंकवादी आहेत असे चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न पाळीव पत्रकार करत आहेत’

मुंबई – कालचा संपूर्ण दिवस एसटी कर्मचारी आणि त्यांच्या आंदोलनामुळे गाजला. काल एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी धडक दिली . यावेळी जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या .

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. दरम्यान, काल घडलेल्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोन्ही बाजूंनी चिखलफेक होत असून यावर आता भाजयुमोचे प्रदीप गावडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या घराबाहेर ST कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे जेवढे दुःख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झाले नाही त्या पेक्षा जास्त दुःख मराठी पत्रकारांना झाले आहे, आंदोलन म्हणजे हल्ला आणि आंदोलक म्हणजे आतंकवादी असे चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न पाळीव पत्रकार करत आहेत. असं त्यांनी म्हटले आहे.