‘पावसात भिजून सुद्धा फक्त ५४ च आमदार निवडूण आले, त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडूण दिले अशा खोट्या थापा मारू नका’

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त काल उस्मानाबाद दौऱ्यावर होते. शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं. संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार असं सांगत होते, पण आम्ही येऊ दिले नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले,गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील जनतेची साथ आणि शक्ती मला मिळाली आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभेत 52 वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं आहे. चार वेळा मला जनतेने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. जनतेने मला खूप दिलं आहे. अजूनही तुमची साथ आहे, तोपर्यंत हे गाडं थकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उस्मानाबाद येथे व्यक्त केला.

दरम्यान, भाजपला टोमणे मारणाऱ्या शरद पवारांना त्यांच्याच भाषेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मा. शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात.

पडळकर म्हणाले, त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे किंबहुना सन्माननीय पवार साहेब हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो   यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळे प्रस्थापितांचा तिळपापड होतोय. म्हणून आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात.

मी पवार साहेबांना सांगू इच्छीतो की  फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे  १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्धा फक्त ५४ च आमदार निवडूण आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडूण दिले अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीसवर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं असं देखील ते म्हणाले.