“मला खेळायचे होते…”, WTC अंतिम सामन्यात दुर्लक्ष केल्याने अश्विन नाराज, सांगितले संपूर्ण सत्य

ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) भारतीय संघाला 209 धावांनी निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रविचंद्रन अश्विनसारख्या (Ravi Ashwin) नंबर वन गोलंदाजाला संघात स्थान न मिळणे. अश्विनला स्थान न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली. आता अखेर अश्विनने आपल्याला या महत्त्वपूर्ण सामन्यात न खेळवण्याबद्दल मौन सोडले आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अश्विनने सांगितले की, “मला जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात नक्कीच खेळायचे होते. कारण संघाला इथे आणण्यात माझाही हातभार आहे. गेल्या फायनलमध्येही मी चार विकेट घेतल्या होत्या. 2018-19 सालापासून परदेशातही माझी कामगिरी चांगली आहे. मी सध्या खेळू शकलो नाही आणि आम्ही विजेतेपदही मिळवू शकलो नाही. मी या निर्णयाकडे प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या दृष्टिकोनातून पाहत आहे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.”

“2021 मध्ये जेव्हा आम्ही इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा संघाने येथे फक्त चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज यशस्वी होईल असे ठरवले होते. त्यामुळे कदाचित सामना सुरू होण्याच्या 48 तास आधी मला खेळण्याची संधी मिळणार नाही हे माहीत होते,” असेही अश्विनने सांगितले.