मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही; संभाजीराजेंचा कडक इशारा

कोल्हापूर –  आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झाली आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी सुनावले आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणावरून संभाजीराजे यांच्या शिवप्रेमी व दुर्गप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे संभाजीराजे छत्रपती यांनी? 
विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल. दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींच्या सोबत किल्ले विशाळगडची पाहणी करून आम्ही जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विशाळगडाचे अतिक्रमित रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते. मात्र लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली. मात्र या बैठकीत ही सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ?

आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषन्न अवस्था झालेली आहे. अजूनही गडावर चालू असलेल्या करवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता शिवभक्त जागा झाला आहे, तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडच्या बाबतीत चालू देणार नाही. आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱ्या दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन. प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत.