बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा शिंदे व त्यांचे सहकारी चालवत आहेत, हीच खरी शिवसेना आहे – फडणवीस 

Pnavel – हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत  भारतीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने विकासाला प्राधान्य देण्याऐवजी सूडबुद्धीचा कारभार सुरू केला. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक केली गेली. या परिस्थितीतही कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले. महाविकास आघाडी सरकारने वारंवार हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा आणि दाऊदच्या विचारांचा बचाव करायचा असे  प्रकार सहन न झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने जनतेने आता मोकळा श्वास घेतला आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे.आम्ही कोणाचेही लांगुलचालन करणार नाही, सर्वांना समान न्याय देऊ.

भाजपा नेतृत्वाने कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता.फक्त सत्तेसाठी त्यांनी जनादेशाचा अपमान केला. कारण काँग्रेस -राष्ट्रवादी बरोबर जायचे त्यांनी आधीच ठरवले होते . शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी चालवत आहेत.हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून मी सरकारबाहेर राहून पक्षाचे कार्य करण्याचे ठरवले होते.परंतु पक्षाने मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला.मी तो पाळला.पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळणे हा माझ्या दृष्टीने कृतकृत्यतेचा क्षण होता, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

फडणवीस म्हणाले की, राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. आम्ही तातडीने आवश्यक कार्यवाही करून हे आरक्षण परत मिळवले.मराठा आरक्षण विषयही आम्ही मार्गी लावू. विकासाचा कार्यक्रम धडाक्याने राबवू.

नव्या सरकारने सत्तेत आल्या आल्या अनेक निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेल स्वस्त केले.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव असे नामांतर केले, नवी मुंबई विमानतळाला दि .बा. पाटील यांचे नाव दिले, स्वच्छ महाराष्ट्र अभियान साठी १२ हजार कोटींची तरतूद केली, गणेशोत्सव, दहीहंडी वरील निर्बंध उठवले, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी निविदा काढली गेली, आरे कारशेड वरील बंदी उठवली, वारकऱ्यांना टोल माफी दिली, असेही  फडणवीस यांनी सांगितले.