Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. 22 जानेवारी रोजी मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरात उत्साह असून अयोध्येत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या भोला दास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत त्यांनी आरोप केला आहे की, भारतीय जनता पार्टी (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय लाभ व्हावा या हेतूने घाईघाईने २२ जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. हिंदू धर्मात (Hindu) पौष महिन्यात कोणतेही धार्मिक विधी केले जात नाहीत. परंतु, प्राणप्रतिष्ठा सोहळा पौष महिन्यात आयोजित केला आहे.

याशिवाय हे मंदिर अद्याप अपूर्ण आहे. हिंदू धर्मात बांधकाम अपूर्ण असलेल्या मंदिरात देवी-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. त्यामुळे चारही पीठांच्या शंकराचार्यांनी या सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर चारही शंकरायार्यांनी (Shankaracharya) या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं आहे. याचिकाकर्ते भोला दास(Bhola Das)  यांनी याचिकेत म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणं आपल्या देशाच्या संविधानाविरोधात आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची राजकीय स्टंटबाजी आहे.असा आरोप देखील यात करण्यात आला आहे.

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. शनिवारी आणि रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने ही जनहित याचिका आता निरर्थक ठरू शकते. कारण सोमवारी मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.